Wednesday 18 January 2017

महाराष्ट्र

महाराष्ट्र

महाराष्ट्र या शब्दाचा उगम फारच रंजक आहे. प्राचीन काळी हा प्रांत दंडकारण्य नावाने ओळखला जायचा. इथे ऋषीमुनीतपस्वी वास्तव्य करीत असत. दंडकारण्य म्हणजे घनघोर घराण्याने व हिंस्त्र श्वपदांनी व्यापलेला. पूर्वी गुन्हेगारांना आणि दुष्टांना इथे सोडले जायचे. भयाण जंगल आणि हिंस्त्र श्वापद यांच्यामुळे व्यक्ती मृत्यूतुल्य कष्ट भोगून यमसदनी जात असे.

विदर्भ, वैराट सरकत्या राजसत्ता इथे राज्य करीत असत. पुढे कालांतराने इथे राष्ट्रकूट राजघराण्याची सत्ता आली. राष्ट्रकूट स्वतःला भारत राष्ट्राचे पालनहार समाजात असत. त्यांची सत्ता त्यांच्या शिखरकाळात मध्योत्तर भारतापासून संबंध दंडकारण्य म्हणजे सध्याच्या दख्खन प्रांतावर होती. राष्ट्रकूट म्हणजे राष्ट्राच्या एकीची समर्पित अशा परिवाराचे व त्यांच्या मांडलिकांचे कूट, म्हणजे संघ होता. या घराण्याची एक शाखा कन्नौज व दुसरी सांप्रतच्या राजस्थानात स्थायिक होती. राजस्थानातील व कन्नौज येथील ती  शाखा म्हणजेच राजपूत राठोड राजघराणे.

अशी ही राष्ट्रकूटांची व्याप्ती भारताच्या बहुतांश भागावर होती. राष्ट्रकूटांच्या सेनेला राष्ट्रीक म्हटले जाऊ लागले. राष्ट्रीक म्हणजे राष्ट्रवादी/ Nationalist. या राजघराण्याच्या काळात अनेक स्थापत्य व कला यांना चालना मिळाली. पुढे या राष्ट्रकूट संचालित राष्ट्राला म्हणजेच राज्याला महान राष्ट्र, अर्थात महाराष्ट्र म्हटले जाऊ लागले. यावरून, राष्ट्रकूटांचे कार्य आणि प्रभाव लक्षात येऊ शकतो.

अशा प्रकारे दंडकारण्य प्रांत हा राष्ट्रकूटांच्या राज्यामुळे महाराष्ट्र झाला. त्यानंतरचा व विशेषकरून १७व्या शतकापासूनचा तो आजतागायत महाराष्ट्राची राष्ट्रभावना ही जगजाहीर आहे.

Saturday 14 January 2017

शिव शिव

कुणी छापिती शिवमुख ध्वजी
कुणी घालिती राजमुद्रा करी
शिवरायांची तत्वे न कळे काही
दाढी वाढवून जो तो आरशात पाही

© कर्रोफर नमुरा

Thursday 12 January 2017

जलदुर्गराज नामे सिंधुदूर्ग

मराठ्यांच्या इतिहासात मराठा आरमाराचे स्थानही अतिशय महत्वाचे आहे. यादव साम्राज्य लयाला गेल्यावर पुढे तीनशेहून अधिक वर्षे भारतात पूर्णवेळ कार्यरत असलेले समुद्री आरमार नव्हते.

आशियातील बलाढ्य सत्ता असलेल्या मुघल साम्राज्याने देखील दक्खन आणि दक्षिण भारताचा ध्यास घेतल्यानंतरही आरमार उभारण्याचा काही फारसा विचार केलेला दिसत नाही. मुघलांच्या थोडयाफार ज्या काही आरमारी मोहिमा झाल्या त्या हंगामी होत्या. अरबांची व्यापारी जहाजे भाडेपट्टीने घेऊन त्यावर हत्यारबंद अरब व मुघल सैनिक चढवून काठाकाठाने काही मोहीमा झाल्या, त्या खोल समुद्रपासून लांबच राहिल्या.

छत्रपती शिवरायांनी मध्ययुगीन भारतात समुद्राचे महत्व ओळखून आरमार उभारणी केली. त्यांच्या मदतीला व समुद्रकिनारा सुरक्षित करण्यासाठी जलदूर्गांची निर्मिती केली. त्यात अव्वल जलदूर्ग ठरला तो सिंधुदूर्ग. राजपुरकर इंग्रज व गोवेकर पोर्तुगीज यांच्या समुद्री कारवायांना त्यामुळे अंकुश बसून, तळकोकणचा किनारा सुरक्षित झाला. महाराजांनी मालवण जवळील कुरटे बेटावरील या जलदूर्गाचे नाव सिंधुदूर्ग का बरे ठेवले असावे? त्याला कारणही तसेच आहे.

सध्याच्या भारत पाकिस्तानातून ही सिंधू नदी वाहते. ही सिंधूनदी पश्चिम वाहिनी असून, गुजरातच्या उत्तरेकडील कराची जवळ समुद्राला जाऊन मिळते. सिंधूसंस्कृती ही फारच समृद्ध आणि जगातील प्रगतशील संस्कृती होती, याला आजचे विज्ञानही प्रमाण देते. ही नदी सागराला जाऊन मिळते म्हणून त्या समुद्रास प्राचीन काळापासून सिंधूसागर असे संबोधतात. अरब या ठिकाणी समुद्री मार्गाचा वापर करून व्यापार करीत असत. त्याच मार्गाने इंग्रज व इतर युरोपीय सत्ता भारतात आल्या. अरबांच्या मार्गावरून आल्यामुळे ते याला अरबी समुद्र म्हणू लागले.

छत्रपती शिवाजी महाराजांना या गोष्टीची जाण होती. आपली प्राचीन समृद्ध संस्कृती ही आपल्या राष्ट्राची अस्मिता असून ही सिंधू नदी तिचे पश्चात्यांना प्रतिनिधीत्व करते, याचे भान शिवरायांना होते. छत्रपती शिवरायांनी कधी सिंधू नदी पहिली नाही, पण रुमशान पर्यंतची राजकीय माहिती असणाऱ्या छत्रपतींना सिंधू नदी व तिचे महत्व माहित होते या बद्दल शंका असण्याचे कारण नाही. या सिंधू नदीमुळे समुद्राला सिंधूसागर हे प्राचीन नाव असून, त्यामुळे राष्ट्राच्या मानसिकतेला फार परिणामकारक आणि उत्तेजना देणारे आहे, हे तो जाणता राजा जाणून होता.

एखाद्याचा राष्ट्राचे मानसिक खच्चीकरण आणि ह्रास करावयाचा तर त्यांची संस्कृती आणि अस्मितेच्या खूणा नष्ट करणे हा पूर्वापार चालत आलेला राजकीय डाव आहे. त्यात पाश्चात्य अग्रेसर असून, समुद्रावर आपली फक्त आरमारी नव्हे तर बौद्धिक सत्ताही असणे हे गरजेचे होते. अशी नावे आणि खूणा या राष्ट्राला प्रेरित करून, त्याबद्दल आपुलकीची आणि कर्तव्याची जाणीव जागृत करतात.

त्यामुळेच, महाराजांनी खोल समुद्रात विहार करणारे निव्वळ आरमार उभारले नाही, तर त्याला साजेसे जलदूर्गही बांधले. कुरटे बेटावरील या मोक्याच्या जलदूर्गाचे शिवरायांनी नाव ठेवले, सिंधुदूर्ग. सिंधूसागरावर अधिराज्य करणारा दूर्ग या नात्याने हे सिंधूसागर आमचे आहे, हा महत्वाचा संदेश त्यांनी शत्रूंना व स्वकीयांना दिला. एखाद्या राष्ट्राच्या अस्मितेला उभारी कशी देता येईल, व मेलेले स्वत्व जसे जागे करता येईल हि महत्वाची शिकवण आपल्याला शिवचरित्रातून मिळते. गरज आहे तर ते चरित्र सजग मनाने वाचण्याची व आत्मसात करण्याची.

© कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com

Sunday 11 December 2016

महाराष्ट्राची संस्कृती आणि आपण

कालच मराठ्यांची राजधानी रायगडावर एक अनुचित प्रकार घडल्याची बातमी येऊन थडकली. शुक्रवारी रात्री काही समाजकंटकांनी चक्क राजदरबारात सिंहासनाच्या जागेवर स्थापित असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर असलेली तलवार उध्वस्त केली. काहींच्या मते हा चोरीचा गुन्हा असून काहींच्या मते चोरीच्या प्रयत्नात केलेली मोडतोड होती. पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला आहे. पण हा निव्वळ चोरीचा प्रयत्न नसून एका राष्ट्रीय पुरुषाच्या प्रतिमेची विटंबना आहे. कारण काहीही असो, निव्वळ आक्रोश आणि त्रागा व्यक्त करण्यापलीकडे जाऊन याची कारणमीमांसा आपण शोधून, हे प्रकार घडण्याचे मूळ असलेली वृत्तीच नष्ट केली पाहिजे. पोलीस आणि प्रशासनाला दोष देऊन आपले इतिकर्तव्य संपत नाही.

या सर्वांच्या मुळाला जाऊन ही मानसिकता नष्ट केली पाहिजे. ज्या रायगडावर भोसले कुलोत्पन्न शिवाजी महाराज छत्रपती म्हणून अभिषीक्त झाले, तिथे खुद्द अभिषीत सदरेवर जाण्याचे धारिष्ट्य आणि प्रमाद आपण रोखला पाहिजे. आजही आपण युरोपात गेलो तर तेथे जुलिअस सीजर आणि इतर ऐतिहासिक प्रभृतींचा मान कसा राखला जातो हे शिकण्यासारखे आहे. रायगडावर सुमारे २०१३ साली महत्वाच्या ठिकाणी कॅमेरातेहळणी संच आणि छोटे नियंत्रण कक्ष उभारण्याचे प्रस्ताव पारित होत असल्याची बातमी आली होती. पण, त्याची अमलबजावणी अद्याप झालेली नाही. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चार पाच वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या समाधी जवळील महाराणी पुतळाबाईंच्या समाधीवरील कुत्र्याचे शिल्प उध्वस्त केले होते. त्यानंतर, स्वयंचलित सुरक्षक यंत्रणा बसवण्याची शिवभक्तांची वाढती मागणी आली. पण आजपावेतो ती अमलात आलेली नाही. लालफितीच्या कारभारापुढे महाराष्ट्राचा अव्वल दुर्गही हतबल ठरत आहे.

पण, हा राहिला प्रशासनाचा भाग. मुळात महाराष्ट्राच्या मातीत आणि घरात अशी विकृत वृत्ती फोफावतेच कशी, हा मुळात प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचे शिरोमणी राखण्यासाठी या साधनांची आणि नियंत्रण कक्षाची गरज का भासावी? हे एक समाज म्हणून आपले अपयश आहे. जिथे भारत देशाला कलाटणी देणारी आणि रसातळाला जाण्यापासून रोखणारी क्रांती झाली, तिथे असे समाजकंटक निपजावेत, हे आपले दुर्दैव नसून अकारकत्व आहे. मुळात, जिथली धूळ आपल्या कपाळी लावण्याची योग्यता नाही तिथे आपण सारे राजरोसपणे जाऊन छायाचित्रे काढतो, विहार करतो आणि कळस म्हणजे मेघडंबरीवर चढून छत्रपतींच्या अंगाखांद्यावर हात ठेवून छायाचित्रे काढण्यात धन्यता मानतो.

मुळात, पुरोगामी म्हणविणारा महाराष्ट्र हा पाश्चात्य आणि आपल्या अभिजात संस्कृतीच्या कचाट्यात तळ्यातमळ्यात सापडलेला दिसतो. शालेय शिक्षण संपवून बहुतांश मराठी तरुण जेव्हा कॉलेजच्या शिक्षणात प्रवेश करतो, तेव्हा त्याला आपल्या संस्कृतीची थोडीफार लाज आणि उदासीनता वाटू लागते. पाश्चात्य संस्कृतीचे ग्लॅमर त्याला भांबाऊन सोडते. गडकिल्ले फिरणे म्हणजे विरंगुळा म्हणून सुरुवात होते, त्याचे पिकनिक मध्ये रूपांतर केव्हा होते, त्याचे त्याला काळात नाही. शिक्षण संपवून कॉर्पोरेट जॉब आणि नौकरी साठी परदेशवारी याच्या रम्य कल्पनेत त्याचे विचार मूळ धरू लागतात, आणि त्या संस्कृतीच्या व्याख्येत महाराष्ट्राची संस्कृती बसत नाही. पुढे कॉर्पोरेट जॉब करत असताना आणि काही परदेशवाऱ्या केल्यावर त्याला जेव्हा प्रगल्भता येते आणि पाश्चात्यांच्या राखलेली त्यांची संस्कृती आणि त्या संस्कृतीचा अभिमान जेव्हा त्यांच्या ऐतिहासिक घटनांशी उगम पावळ्याची त्याच्या लक्षात येते, तेव्हा आपल्या संस्कृती विषयी आपल्याला काहीच माहिती नाही हे उमगून, त्याचे मन आपल्या संस्कृतीचे वेध घेण्यासाठी धजावते. त्यानंतर, जेव्हा परदेशातही कुठे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र अभ्यासले जात असल्याचे कळते, तेव्हा त्याची उत्कंठा शिगेला जाऊन तो आपल्या संस्कृतीचे ज्ञान मिळवण्यास सुरुवात करतो.

दुसरा वर्ग, गावी खेडोपाडी राहून मुंबई पुण्या सारख्या शहरांकडे आसुसलेल्या नजरेने पाहत मोठा होतो. उच्च  शिक्षणासाठी किंवा नौकरी निमित्त या शहरांकडे धाव घेतो. मुंबई पुण्याच्या पश्चातलेल्या वर्गाकडे, राहणीमानाकडे आकर्षित होऊन, त्यांच्याशी साम्य साधण्याचे प्रयत्न करू लागतो. त्या नादात तो केव्हा वाहवत जातो त्याला स्वतःला समजतही नाही. मग, सिंहागडाची वारी तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची न होता, एक सहल म्हणून होते. मग, वरील दोन्ही वर्ग ज्यांना इतिहासाशी विशेष सुसंगती झालेली नसते, ते या सांस्कृतिक स्थळांकडे भूतकाळातील पडीक वास्तू म्हणून पाहू लागतात. जेव्हा त्यांना या वस्तूंची पडझड दिसते, तेव्हा त्यांचे अल्पायुत्व गृहीत धरून, कळतनकळत त्यांच्या विध्वंसास कारणीभूत ठरतात.

तिसरा वर्गही आहे, जो गडकिल्ल्यांवरील ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू आपल्याच अधीन असलेल्या असहाय आहेत हे गृहीत धरून, त्याचे विकृतीकरण, चोरी, नासधूस यात धन्यता मानतो. शिवाय, खळबळ माजवने, सामाजिक कटुता पसरवणे, विशिष्ट समाजाला बदनाम करणे असे मानत असतो. असे, अनेक कुपोषित बुद्धीचे अज्ञानी हे राजकीय व गैरसामाजीक शक्तींच्या हातचे कळसूत्री बाहुली होऊन दुष्कर्म करतात. काहींना या उपेक्षित वास्तू हे पटकन पैसे कमावण्याचे साधन दिसू लागते. कारण काहीही असो, आपण या सर्व अज्ञान आणि विकृती रोखण्यात अपयशी ठरतो, हे समाज म्हणून आपले अपयश आहे.

मुळात, आपल्या मुलांना आपण इतर मुलांच्या तुलनात्मक  स्पर्धेत झोकून देतो, आणि फक्त शालेय प्राविण्य हेच सर्वकाही असा समज देऊन त्यांना मोठे करतो, तिथेच सर्व गणीत बिघडते. लहान मुलांची कोमल मने यात कोमेजून जातात, त्यांची मती कुंठीत होते आणि त्यांची सारासार विचार शक्तीच नाहीशी होऊन जाते. त्यातून, आयुष्याच्या स्पर्धेत आलेले सुरुवाती अपयश आणि न्यूनता यामुळे असूया आणि विकृती जन्माला येते. मग, स्वतःच्या कुंठीत मतीचा वापर ते अशा असहाय आणि दुर्लक्षित वस्तूंवर घेऊन धन्यता मानतात.

मुळात, पालक आणि समाज म्हणून आपण आपल्या संस्कृती आणि सभ्यतेची ओळख शास्त्रशुद्धपद्धतीने लहानपणीच करू द्यायला हवी. त्यांची नाळ या संस्कृतीशी आणि इतिहासाशी कशी जुळलेली आहे याचे त्यांना भान मिकवून द्यायला हवे. आपल्या शिक्षण पद्धती मध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. शाळांमध्ये शिक्षणा व्यतिरीक्त जबाबदार नागरिक होणे, त्यासाठी अशा ठिकाणी कार्यशाळा घेणे आणि श्रमदान करणे या गोष्टी उपक्रमात आणणे आवश्यक आहे. सामजीक संस्थांनी या विषयी जागरूकता आणणारी तज्ञांची व्याख्यानं आपापल्या परिसरात आणि शाळांच्या मदतीने योजला पाहिजेत. निव्वळ, वार्षिक संमेलने भारावून आणि प्रदर्शने भारावून भागणार नाही. पालकांनी मुलांना ऐतिहासिक गोष्टीची पुस्तके लहानपणी आणि संदर्भ ग्रंथ तरुणपणी वाचण्याची सवय लावली पाहिजे.

फक्त, मुले सुशिक्षीत झाली ह्यात धन्यता नसून, ती सुसंस्कृत आणि जबाबदार होणे यात खरे आयुष्याचे फलित आहे, हे आपण एक समाज आणि पालक म्हणून जाणले तेव्हाच काही सकारात्मक बदल घडेल. नाहीतर, हळाळणे आणि व्यर्थ वाचाल निषेध यातून काहीच साध्य होणार नाही. कृतिशील मराठी तरुण, हाच आपला ध्येय धरला तेव्हाच आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा तो यशस्वी नागरिक होईल. हीच खरी मनुष्य जन्माची सफलता ठरेल आणि महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती जगात नावारूपाला येईल.

कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com

Saturday 10 December 2016

महाराष्ट्राचे दुर्गसंवर्धन आणि आपण

महाराष्ट्र सारखा ज्वलंत इतिहास आणि ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. क्षेत्रफळाचा विचार करता एकट्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण एवढे किल्ले जरी मोजले तरी त्याच्या अर्धे किल्लेही दुसऱ्या राज्यात नसतील. पण, कर्नाटक, गोवा, राजस्थान, तामीळनाडू व इतर राज्यात जशी जोपासना किल्ल्यांची आणि इतर ऐतिहासिक वारशांची झाली तशी ती महाराष्ट्रात होत नाही. हा आपला कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल. समाज आणि प्रशासन दोन्ही आघाड्यांवर आपण अपयशी ठरलोय. राज्य सरकारने तर मुंबई उच्च न्यायालयात एका जनहीत याचिकेच्या सुनावणी वेळी, ऊन-पाऊस-वाऱ्यामुळे किल्ल्यांची वाताहात झाली असे प्रतिज्ञापत्र दाखल केले. गडकिल्ले जोपासणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या अवाजवी असल्याचे मतही त्यांनी मांडले. राजस्थान आणि गोवा ही दोन राज्ये तर प्रामुख्याने पर्यटन आणि त्यात ऐतिहासिक पर्यटनावरच चालत आहेत. राजस्थान, कर्नाटक, तामीळनाडू आणि केरळ यांनी तेथील किल्ले, ऐतिहासिक मंदिरे आणि इतर ऐतिहासिक वास्तू/ वस्तू ह्या संवर्धन करून त्यातून मिळकत ही मिळवली आहे. ते सर्वात प्रगतीशील म्हणवणार्या महाराष्ट्र राज्याला जमले नऊ, नव्हे त्यांनी तो प्रयत्न समाज-प्रशासनाच्या उदासीनते मुळे कधी मनावर घेतलाच नाही.

यात सरकार-प्रशासनाला फक्त दोष देऊन चालणार नाही. कारण ते लोकनियुक्त सरकार हे समाजाचेच प्रतिबिंब आहे. सरकार बहुमताने चालते तसेच बहुतांश मराठी माणसाला आपल्या इतिहास आणि ऐतिहासिक संस्कृती विषयी अनास्था आहे, हे कुणालाही अमान्य करता येणार नाही. आपला घराण्याचा ऐतिहासिक ठेवा - मोडीपत्रे, शस्त्रे व इतर वारसा रद्दी-भंगारात काढणाऱ्या महाराष्ट्राकडून गडकिल्ले ह्यांची हेळसांड झाली तर नवल वाटण्याचे कारण नाही. एकदा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे खानदेशातील एका देशमुखांच्या घरी काही ऐतिहासिक संदर्भ सापडतात का बघायला गेले होते. तिथे बाबासाहेब पोचल्यावर सदर असामी वाड्याच्या अंगणात स्नान घेत होती. स्नानासाठी पाणी कढवण्यासाठी केलेल्या चुलीत मोडीलिपीतली कागदपत्रे जाळण म्हणून वापरण्यात येत होती. बाबासाहेब चक्रावलेत. त्या मोडी लिपीच्या पत्रांमध्ये एखादा महत्वाचा कागद/ ऐतिहासिक पत्र जाळून गेले असतीलही. कारण ते कुणीच वाचले नव्हते. देशमुखांना त्याची कल्पना दिल्यावर त्यांनी मोडी लिपी येत नसल्याने मजकूर कळत नाही व आम्ही ती जाळण म्हणून वापरतो असे उत्तर दिले व यापुढे तसे करणार नसल्याची ग्वाही दिली.

पण, सर्वच तसे नसतात. काही घराणी तर आताच्या जगात काय करायचा आहे इतिहास, तलवार म्हणत ती मुद्दाम भंगारात टाकतात. याच, किलोच्या भावाने लोखंड म्हणून विकलेल्या वस्तू पुढे पुरतानवस्तू संग्रहकांकडे, देशात नव्हे परदेशात प्रामुख्याने जातात. मग, आपण बोंबा मारत बसतो, परदेशात गेली कशी, इंग्रजांनी नेली का? वगैरे वगैरे, व कालांतराने विसरूनही जातो. हा क्रम असाच सुरु राहतो. बाबासाहेबांनी अशाच काही भंगारात टाकू घातलेल्या वस्तू त्यांची विटंबना थांबवून जतन करण्यासाठी नेल्या, तर आज त्यांच्यावर घराण्याची शस्त्रे व इतर ऐवज अभ्यासासाठी नेऊन परत न केल्याचा आरोप होत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

गडकिल्ले फिरणारे वाया गेले, इतिहासाची साधने वाचणारी माणसे सनकी असतात, अशी शेरेबाजी कॉर्पोरेट म्हणवणाऱ्या व मराठी इतिहासाची लाज वाटणाऱ्या सुशिक्षीत मराठी तरुण करू लागतो तेव्हा आपला तो दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. भले आज इतिहास, गडकिल्ले यांच्याबद्दल आत्मीयता वाढली आहे, तरी तो वर्ग अजून फारच नगण्य आहे. कुंपणावरून बघ्याची भूमिका करून शेरेबाजी करणाऱ्यांची संख्याच अधिक आहे. आजच्या जगात विमाने, मिसाईलने युद्धे होत असताना गड किल्ल्यावरून तलवारी घेऊन लढणार का, ही शेरेबाजी सर्वाधिक ऐकायला मिळते. हाच बुद्धिवादी वर्ग पावसाळ्यात किल्ल्यालगतच्या निसर्गात स्वतःचे कॉर्पोरेट त्राण घालवण्यासाठी मराठी-अमराठी सवंगड्यांना घेऊन पिकनीक साठी जात असतो आणि सोशल मिडीयावर आपले आत्मा हरवलेला सेल्फी टाकत असतो. मराठी माणसानेच महाराष्ट्राची अशी लाज काढल्यावर अमराठी लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही.

पांढरा हत्ती का पोसायचा, अशी गडकिल्ले संवर्धनाची अवहेलना केली जाते. मुळात, अज्ञान आणि संकुचित वृत्ती हे या खोडसाळ वक्तव्याला कारणीभूत ठरते. आपल्या दुर्गसंपत्तीकडे निव्वळ भूतकाळाच्या खुणा म्हणून न बघता त्याकडे आजच्या काळानुरूप एक पर्यटन आणि सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून बघणे अधिक श्रेयस्कर आहे. कॉर्पोरेट आणि पुरोगामी म्हणवणार्या आजच्या पिढीला हे उत्पन्नाचे साधन कसे उमगत नाही हाच एक प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ले दुरुस्त करून, बांधून त्याभोवती गावे वसवली. ढेपाळलेली बाराबलुतेदार पद्धत पुन्हा सुरळीत करून स्वराज्याची विस्कटलेली सामाजिक आणि आर्थिक घडी पुन्हा सावरली व गावे स्वयंपूर्ण केली.

आजच्या आधुनिक शतकात त्याचे रूपांतर आपण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनात करू शकतो. गडकिल्ले संवर्धन/ जीर्णोद्धार करून त्यावर अभ्यास सहली, ध्वनिप्रकाश यंत्रणा वापरून इतिहास रंजकपणे मांडता येऊ शकतो. शिवाय, आजूबाजूच्या गावात वाटाडे (guide), आसपासची कलाकुसर, वन्यजीवन, खाद्यसंस्कृती, निसर्ग या द्वारे आपण रोजगारही उपलब्ध करू शकतो. गावे स्वयंपूर्ण होऊन, गावातील तरुण वर्ग आपल्या गावाशी, मातीशी आणि कुटुंबाशी एकरूप होऊन राहू शकेल. त्याला मुंबई, पुणे सारख्या शहरांकडे नौकरी साठी भटकावे लागणार नाही. पण, यासाठी समाज आणि प्रशासन जागृत झोके पहीजे. गडकिल्ल हीे भूतकाळाची स्मारके नसून आपला ज्वलंत इतिहास आहे आणि तो जपून, जगाला सांगून आपण त्यांना भविष्याचे भांडार बनवू शकतो, ही भावना मनात रुजली पाहिजे.

यासाठी, समाज प्रबोधन होणे आवश्यक आहे. सरकारी धोरण बनून दुर्गसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था, तज्ज्ञ यांना नियमित करून आवश्यक ते सहकार्य केले पाहिजे. परदेशी पर्यटकांकडून अशा सहली, व्याख्यानं आणि उत्सवांची प्रचंड मागणी आहे. त्यांना योग्य ती व्यवस्था, मार्गदर्शन आणि सुरक्षा सरकारने पुरवले पाहिजे. स्थानिक तरुणाईला वाटाडे, सुरक्षा, प्रथमोपचार, गिर्यारोहण, इतिहास संशोधनात प्रशिक्षण आणि इतर संलग्न बाबींत आपले व्यवसाय निवडण्याचे व त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांचे पर्याय खुले करून दिले पाहिजेत.

त्यासाठी, तज्ञ मंडळी आणि संस्थांसोबत सरकारने नियमावली घालून करार केले पाहिजेत, ज्यामुळे या सर्वाला चालना मिळेल. गडकिल्ले यांच्यासोबतच गुफा, लेणी, समाध्या, घटमाथे, गिर्यारोहण, निसर्गसहल, साहसखेळ यांचाही विचार व्हावा, जेणेकरून देशीविदेशी पर्यटकांना एक परिपूर्ण पर्याय उपलब्ध होईल व समाजसोबतच सरकारलाही उत्पन्नाचे स्रोत खुले होतील. महाराष्ट्र एक परिपूर्ण राज्य आहे, उठे डोंगरदऱ्या, नद्या, समुद्र, इतिहास, संस्कृती, उद्योग, निसर्ग, वन सारे काही उपलब्ध आहे. क्वचितच एखाद्या भारतीय राज्यात एवढे परिपूर्ण साधने असतील. पण जेव्हा समाज आणि सरकार विवेकपूर्ण पाऊले उचलतील, तेव्हाच आम्हाला ते साधेल.

तोपर्यंत, कालाय तस्मय नमः

कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com

Friday 9 December 2016

महाराष्ट्राचे दुर्गवैभव आणि आपण

महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून एक समृद्ध, प्रगतीशील आणि पराक्रमी देश आहे, हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे. प्राचीन काळी हा प्रांत ऋषीमुनींचे आणि महारथींचे दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम हे येथील राष्ट्रीकांचे वैशिष्ट्य राहिले आहे. अगदी कला, स्थापत्य आणि निसर्गसौंदर्य हे देखील या भूमीला वरदान ठरले आहेत. अजिंठावेरुळचे स्थापत्य तर जगाला भुरळ घालत आहेत. लोणारचे खारयुक्त सरोवर हे खगोलतज्ञ आणि वैज्ञानिक यांचे आवडते ठिकाण.

अनेक वैदिक, पौराणिक, मध्ययुगीन आणि अर्वाचीन दाखले याला प्रमाण आहेत. सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादवांच्या पराक्रमाचे, स्थापत्याचे आणि कलासंस्कृतीचे ऐश्वर्य जगजाहीर आहे. संत ज्ञानेश्वरांपासून शिगेला पोचलेली महाराष्ट्राची भक्ती परंपरा ही यादव साम्राज्याच्या सुवर्ण काळाची तसेच परकीय आक्रमणाची व जुलमी राजवटींची साक्षीदार आहे. तो हा गौरवशाली महाराष्ट्र यादव साम्राज्याच्या अस्ता पासून पारतंत्र्याच्या तीनशे वर्षांच्या दलदलीत अडकून पडला.

पण, महाराष्ट्राची पुण्य भूमी या अतिरेकाला जास्त काळ जुमाणणार नव्हतीच. ज्या प्रमाणे समधीमग्न साधक आपल्या ध्यानावस्थेतून नवीन तेजाने सजग अवस्थेत येतो, त्याप्रमाणे ऋषीमुनींची ही तपोभूमी वेरूळच्या निसर्गातून सुप्त अवस्थेतून जागृत झाले. भोसले कुळीचे शिलेदार पुढे सरदार मालोजीराजे झाले आणि शहाजीराजेच्या काळात सुलतानी अमदनीत अव्वल सरदार म्हणून ख्याती पावले.

शहाजीराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण त्यांना स्वतंत्र साम्राज्य उभे करणे दुरापास्त राहिले. यादव साम्राज्याचे गतवैभव आणि परकीय जुलमी सत्तेची जुलूम अनुभवलेल्या शहाजीपत्नी जिजाबाईसाहेब यांनी त्यातून धडे घेत आपली कूस पोसली आणि ती शिवनेरीवर परावर्तित झाली, ती बालशिवाजीराजांच्या रुपाने. तो काळ महाराष्ट्राचा सुवर्णकाळ ठरला. त्या द्रष्टया राजाने शक्ती, युक्ती आणि नीतीच्या जोरावर शून्यातून स्वराज्य निर्माण केले. "साऱ्या राज्याचे सार ते हे दुर्ग" या नेमाने राज्यभर स्वराज्याचे विणकाम आणि रयतेची सुरक्षा या दुर्गम गडदुर्गांच्या साथीने केले. कित्येक किल्ले त्यांनी हस्तगत केले, माजनूत केले, वाढवले तर कित्येक नव्याने बांधले.

सह्याद्रीच्या रुपाने निसर्गच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्याचा पुरेपूर व सुयोग्य वापर श्रीशिवछत्रपतींनी केला. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, मुरारबाजी देशपांडे यासारख्या अनेक मत्ताब्बर सरदारांनी या दुर्गांचा रक्षणासाठी, ते मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती स्वराज्याच्या यज्ञमंडपात दिली आणि स्वराज्याचे तेज आणि कीर्ती वाढवली. असंख्य मावळे शिलेदार यांनी हे स्वराज्याचे दीपस्तंभ राखण्यासाठी आपले प्राण गमावले. प्राणांचे मोल देऊन हजारो मराठ्यांनी राखलेले हे गडकिल्ले हे महाराष्ट्राची जिवंत अस्मिता आणि शान आहेत, मराठयांच्या धगधगत्या इतिहासाचे जिवंत किर्तीस्तंभ आहेत.

पण, आज हेच गडकिल्ले विपन्नावस्थेत आहेत. आणि, नाही राजकारण्यांना शब्दाने बडवणे हे काही या लेखाचे उद्दिष्ट नाही, कारण आमचे मते ते समाजमनाचेच प्रतिबिंब आहेत. समाज आणि शिवाजी महाराजांचा स्वाभिमान बाळगणारे आणि त्यांचे तस्वीरी, पुतळे घराघरात, चौकाचौकात लावणारे आपण, जाय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांपुढे जाऊन काय करत आहोत?

तर, आपण (म्हणजे आपल्यापैकी अनेक जण) गड किल्ल्यांचे चिरे घर बांधण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, किंवा कुंपण बांधण्यासाठी वापरत आहोत; गडावरच्या मुर्त्या, तोफा एकतर गडाखाली ढकलून वीरश्री मानत आहोत किंवा  त्या आपल्या घरी, शेतात नेऊन त्यांची विल्हेवाट लावत आहोत; महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची शोभा असलेल्या मुर्त्या, नाणी, शस्त्रे ऐवज एकतर आपल्या घरच्या मालमत्ता झाल्या आहेत किंवा तस्करांमार्फत परदेशी संग्रहालयात पोचत आहेत. आणि, हे सर्व कमी पडते म्हणून का काय आपण तटाबुरुजांवर आपले, आपले प्रेयसींचे नाव गिरवून मोकळे होतो. गेल्या तीन वर्षात मुंबईजवळील आसनगाव, शहापूर येथील किल्ले माहुली येथील अवजड नंदी व इतर काही मुर्त्या गहाळ झाल्या आहेत. या किल्ल्याला शाहजीराजे भोसले आणि शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे. काय दुर्दैव!

आपल्यापैकी बहुतांश जणं गडकिल्ले जातो, छायाचित्रे काढतो व अरेरेरे करत ती छायाचित्रे सोशियल मीडियावर टाकून 'हे थांबलेच पाहिजे' वगैरे शेरेबाजी करून काही काळाने विसरून जातो. काळाच्या बलवत्तरतेने व निसर्गाच्या ऊन, वारा, पाऊस या नियमांना सोडले तर बाकी आपल्या दुर्गांची अवदशा जी  काही झाले ती आपणच केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे डोळे हा विषय निघाला की पाणावतात व ते सद्गतीत होतात. "गडकिल्ले यांच्यावर विपुल लेखन करून मी आणि गोनीदांनी अपराध केला आहे. आमच्यामुळेच लोक गडकिल्ल्यावर जाऊ लागले व हे सर्व घडत आहे" असे उद्वेगपूर्ण स्वतःच्या मनाला हे इतिहासतपस्वी दुषणे देऊ लागतात, तेव्हा त्यांची अवस्था बघवत नाही. वास्तविक आमचे मते बाबासाहेब, अप्पासाहेब दांडेकर यांच्यामुळे किल्ले मूक मरण मारणार नाहीत हे चांगले झाले, पण पुढे ते होत असताना आपण आपली पायरी विसरून आपल्या सोन्यासारख्या दुर्गसंपत्तींची माती करत आहोत.

हल्ली बरीच मंडळी संस्था उभारून दुर्गसंवर्धन करीत आहेत, ही चांगली बाब आहे. पण, साजूकमनाने व नितीमत्तेने गडकिल्ले संवर्धन करणारे कमीच. आपण संवर्धन करीत असलेले सदर किल्ले आणि त्या गडकिलल्यांवर सापडणारा ऐवज आपल्या पूर्वजांची मालमत्ता असल्यासारखे वागत आहेत. बहुतेक प्रत्येकाने आपापले क्षेत्र वाटून घेतले आहे, त्यावर मक्तेदारी असल्यासारखी फुशारकी मिळवणारे भाष्य करीत आहेत. ते कमी म्हणून कि काय एकमेकांना कमी लेखणे आणि एकमेकांवर चिखलफेक करणे, अगदी सार्वजनिक व्यसपीठांवर सुरु आहे. हे चित्र भयानक असून अहमहमिकेला खतपाणी घालणारे ठरेल. किल्ल्यावर मिळणारे जिन्नस म्हणजे आजोबांचा वारसाच असल्यासारखे वागत आहेत.

बरे, इतिहासतज्ञ आणि पुरातत्वतज्ञ हेही मूग गिळून गप्प आहेत. प्रसंगी अपमान आणि मुजोरी करणाऱ्या संस्थाना ज्ञान देण्यापेक्षा आपण बरे आणि आपले काम बरे हे तंत्र त्यांनी अवलंबलेले दिसते. त्यांना दोष देता येत नाही, कारण त्यांच्या आवाजाला समाजाचा प्रतिसाद मिळत नाही. पुरातत्व विभाग आणि सरकारने यात लक्ष घालून १ मे १९६० सालची स्थिती आणि आजची स्थिती यांचे ऑडिट केले पाहिजे. संबंधित संस्था आणि कार्यकर्ते यांना नियमात आणून जबाबदार संवर्धन आणि संग्रह करण्यास भाग पाडले पाहिजे, तरच हा महाराष्ट्राचा दुर्गवरसा टिकेल.

जो आपला इतुहास विसरतो, तो आपला भविष्य धोक्यात घालतो, ही प्रसिद्ध उक्ती लक्षात ठेवली पाहिजे. महाराष्ट्राचा तरुण आणि विवेकी वर्ग जुनेजाणत्यांचा अनुभव घेऊन या बाबत काही करतील तोच आधुनिक महाराष्ट्राचा नवे पर्व ठरेल.

कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com